मन, बुध्दी व शरीर यांबाबत थोडेसे अधिक बोलू
आपण यापूर्वीची पोस्ट वाचलीच आहे. आपली मूळ समस्या मन, बुध्दी व शरीर आणि ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे ! इथे आपण थोडा वेगळा विचार करणार आहोत. धर्म व देवता यांच्या पलिकडे जाऊन हया मूळ समस्येचा अधिक विचार करणार आहोत. म्हणजेच, हे कर्तेकरविते शरीर, मन व बुध्दी हे स्वत:च आहेत का ? हा स्वतंत्र विचार आपण इथे विचारात घेणार आहोत. शरीर मनाचे ऐकते की मन शरीराचे ? दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास , शरीराची ईच्छा मन मानते की मनाची ईच्छा शरीर मानते ? थेट बोलतो. शरीराचा मनावर परिणाम होतो की मनाचा शरीरावर ? असे दिसते की हे दोन्ही एकमेकांत गुंतलेले पदार्थ आहेत. म्हणजे गुंतागुंत आहे ! ही समस्याच असल्याने ती गुंतागुंतीची असणारच. किंबहुना, ही समस्याच जीवनातील सर्व समस्यांचे निर्मितीकेंद्र असल्याने ती अधिकच गुंतागुंतीची असणार हे उघडच आहे. अर्थात, बहुतेकजण हे इतक्यात मान्य करणार नाहीत. पण आपण मागील लेखातही वाचले आहेच की , आपले शरीर ,मन व बुध्दी यांच्या व्यवहारातून जीवनात अनेक घटना घडतात. त्यात अनेक समस्याही असतात...